लोकशाहीचा शत्रू (अग्रलेख)   

कोणत्याही राजकीय पक्ष आणि संघटनेवर कारवाई सोपी जावी याकरता युनूस यांनी कायद्यात बदल केला आहे. जुलै २०२४ मधील आंदोलनातील नेते-कार्यकर्ते यांची सुरक्षितता आम्ही पाहात आहोत, या त्यांच्या विधानातील अर्थ वेगळा सांगण्याची गरज नाही. 
 
बांगला देशातील हंगामी सरकारचे प्रमुख महमद युनूस यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घातली आहे. बांगला देशाचे स्वतंत्र अस्तित्व पुसून टाकण्यासाठी टाकलेले आणखी एक पाऊल, याच दृष्टीने युनूस यांच्या या निर्णयाकडे पाहता येईल. परकीय शक्तींच्या मदतीने त्यांनी लोकनियुक्त सरकार उलथवून टाकले आणि हंगामी सरकार स्थापन केले. हंगामी शब्दाचा त्यांच्या लेखी असलेला अर्थ स्थायी, असा असावा. कारण सत्ता सोडण्याची त्यांची तयारी नाही आणि निवडणुका घेण्याची इच्छा नाही. निवडणूक घ्यायचीच झाल्यास सर्वात मोठ्या पक्षाचा अडथळा त्यांना नको आहे. युनूस यांच्या मूक संमतीने बांगला देशात अल्पसंख्याकांच्या शिरकाणाचे सत्र सुरु झाले. या नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञाविरुद्ध खरेतर दहशतवाद माजविल्याबद्दल कारवाई होणे आवश्यक आहे. तीच व्यक्ती अवामी लीगवर दहशतवाद माजविल्याचा ठपका ठेवून बंदी घालत आहे. हा विरोधाभास खरा; पण पाकिस्तानसह आजच्या बांगला देशाचे ते वास्तव. विद्यार्थ्यांच्या तथाकथित आंदोलनाच्या नावाखाली शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात आली. आयएसआय आणि बांगला देशातील धर्मांध संघटनांच्या तालावर नाचणार्‍या विद्यार्थी संघटनांनाच बंदीच्या मागणीसाठी पुढे करण्यात आले आहे! या संघटनांनी नॅशनल सिटिझन्स नावाचा पक्ष स्थापन केला, त्याच्या कार्यकर्त्यांना युनूस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनासाठी बसविण्यात आले! देशाची आर्थिक धूळधाण, विस्कळीत समाजजीवन, अल्पसंख्याकांचा आकांत या सर्वांपेक्षा युनूस यांना नियोजनबद्ध धरणे आंदोलन महत्त्वाचे वाटले! हिंसाचारात होरपळलेल्या हिंदू धर्मीयांना याच युनूस यांनी धीर धरण्याचा आणि सरकारच्या भूमिकेबद्दल तातडीने निष्कर्ष न काढण्याचा शहाजोग सल्ला दिला होता. इस्कॉनचे बांगला देशातील प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांच्यावर सूडबुद्धीने झालेली कारवाई असो अथवा अवामी लीगच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र, युनूस यांची दहशतवाद्यांबरोबर हातमिळवणी असल्याचे वेळोवेळी दिसले. 

कारस्थानी मानसिकता

शेख हसीना भारतात आश्रयाला आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत परतता येऊ नये याकरता जे-जे करणे आवश्यक आहे ते या गृहस्थाकडून केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी शेख हसीना आणि त्यांच्या पाच सहकार्‍यांविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. हिंसाचारात अबू सय्यद नावाच्या एका किराणा दुकानदाराचा मृत्यु झाला. त्याप्रकरणी हा गुन्हा आहे. बांगला देशातील लोकशाही तर युनूस यांनी संपवलीच, शिवाय जबाबदारीचे पद भूषविताना पाळावयाचे संकेतही धुडकावले. शेख हसीना यांचे निकटवर्तीय असल्याचा ठपका ठेवून अनेक अधिकार्‍यांवर झालेली कारवाई, हा त्यांच्या कारस्थानी मानसिकतेचा नमुना. लष्करप्रमुख वकार उज्जमान यांना हटविण्याची त्यांची इच्छा मात्र अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली दुसरा पाकिस्तान आकाराला आला आहे. भारतीय उपखंडासाठी हा सर्वात मोठा धोका म्हणावा लागेल. शेख मुजिबूर रेहमान यांच्या अवामी लीगने पाकिस्तानी शासकांच्या दडपशाहीला आव्हान दिले. पाकिस्तानी लष्कराने केलेले अनन्वित अत्याचार, बंगाली भाषकांचा घुसमटणारा श्वास या पार्श्वभूमीवर अवामी लीगने विराट आंदोलन उभारून बांगला देश निर्माण केला. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताच्या चिंधड्या उडाल्या. तो विषारी सिद्धांत जिवंत ठेवण्याची धडपड अलीकडे वाढल्याचे दिसते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ओकलेली गरळ आणि नंतरचे पहलगाममधील हत्याकांड जगाने पाहिले. बांगला देशाची ओळख पुसून टाकण्याची कामगिरी युनूस यांच्याकडे आली आहे. शेख मुजिबूर यांच्या प्रतिमा हटविणे, त्यांची स्मृतीस्थळे नष्ट करणे याआधी झाले. आता अवामी लीगला ते बेकादेशीर ठरवू पाहात आहेत. याच प्रकारच्या दडपशाहीला पाकिस्तानात बलूची समूहाकडून कोणते प्रत्युत्तर मिळत आहे, खैबर पख्तुनख्वामधील नागरिक कोणत्या भूमिकेत आहेत, हे युनूस यांना माहीत आहे. बांगला देशात अन्य भाषिक गट नसले तरी तेथील सर्वच घटकांनी विवेक आणि बुद्धीला सोडचिठ्ठी दिलेली नाही, याचा त्यांना विसर पडला आहे. 

Related Articles